नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पट्ट्यात वसलेले एक अविस्मरणीय  शहर आहे. हे शहर मनमोहक दृश्ये, आवाज आणि अनुभवांनी परिपूर्ण आहे. हे शहर ऐतिहासिक वारसा (historical heritage), सांस्कृतिक आकर्षणे (cultural attractions) आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी (natural beauty) ओळखले जाते. जुन्या आणि नव्याचा मेळ घालणाऱ्या दुहेरी ओळखीसाठी नाशिकला ओळखले जाते. यात एका बाजूला भव्य ऐतिहासिक मंदिरे आहेत आणि दुसरीकडे आलिशान वायनरी आहेत ज्या अतिशय प्रभावी बनवल्या आहेत. नाशिकला या कारणास्तव ‘भारताची वाईन कॅपिटल’ मानले जाते. नाशिकपासून जवळ असंख्य सुंदर हिल स्टेशन आहेत जिथे तुम्ही तुमचा वेळ छान घालवू शकतात. नाशिकमधील हिवाळा आपल्यासोबत अनेक उपक्रम आणि अनुभव घेऊन येतो. आरामदायी कॅफे आणि उबदार हिवाळ्यातील बाजारपेठांपासून ते विस्मयकारक निसर्गरम्य देखाव्यापर्यंत सर्व काही तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. नाशिक, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे, जिथे तुम्ही पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकू शकता आणि निसर्गाचा बहर उत्तम प्रकारे पाहू शकता.

इगतपुरी हिल स्टेशन
(Igatpuri Hill Station)

एक नयनरम्य हिल स्टेशन आणि सह्याद्रीची शान म्हणजेच इगतपुरी (Fog City). पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये इगतपुरीचे भव्य हिल स्टेशन समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हटले कि आपल्यासमोर नाव येते महाबळेश्वर पण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हा पण पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. निसर्गाची विपुलता लाभलेल्या या तालुक्यातील अनेक गड-किल्ले, पर्वतरांगा, धबधबे आणि छान वातावरण पृथ्वीवरील नंदनवन खुलवते. महाराष्ट्राची चेरापुंजी आणि भाताचे कोठार म्हणून पण या शहराला ओळखले जाते. इगतपुरी गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी असलेले विपश्यना केंद्र शहराचे खास आकर्षण आहे. देशातील निरनिराळ्या भागातून तसेच परदेशातूनही अनेक लोक विपश्यनेसाठी येतात.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते जानेवारी

फ्लॉवर पार्क
(Flower Park)

गुलशनाबाद म्हणून ओळख असणाऱ्या नाशकात देशातील पहिले फ्लॉवर पार्क साकारले गेले. रंगीबेरंगी फुलांच्या महोत्सवात प्रत्येकाला सेल्फी काढण्याचा मोह होईल असा हा उत्सव असतो. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देश आणि विदेशातील पर्यटक फुलांचा आनंद लुटण्यासाठी इथे गर्दी करताना दिसतात. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच फ्लॉवर पार्क आहे. मोर, कार, टुमदार घर, फ्लॉवर पॉट, हार्ट शेप आदी असंख्य प्रकारात फुलांच्या रोपांची सजावट करण्यात येते. त्यामुळे हा महोत्सव ‘सेल्फी महोत्सव’ म्हणून देखील ओळखला जातो. सुंदर फुलांवर पडणारा नैसर्गिक प्रकाश तुम्हाला या बागेच्या प्रेमात पाडेल. जणू नाशिकमध्ये फुलांची नगरीच अवतरते. म्हणूनच नाशिकचे फ्लॉवर पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरते.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते जानेवारी

सुला वाईनयार्ड
(Sula Vineyard)

१९९९ मध्ये नाशिकमध्ये वाईनरी सुरू करणारी सुला वाईनयार्ड ही पहिली कंपनी. भारताची वाईन कॅपिटल’ असा नावलौकिक मिळवून नाशिकमध्ये कंपनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जितकी त्यांची वाईनची चव चांगली तितकीच सुला वाईनयार्ड ही जागा खूप प्रेक्षणीय आहे. समोर हिरवेगार शेत, मध्यभागी गॅलरीसारख हॉटेल किंवा टेस्ट सेंटर, लांब नजर जाईपर्यंत दिसणारी शेती आणि हातात वाईनचा ग्लास हा अनुभव किती अविस्मरणीय आहे. सुलाफेस्ट (Sula fest) मध्ये वार्षिक वाइन-आणि-संगीत महोत्सव देखील आयोजित केला जातो. या फेस्ट मध्ये अनेक फॉरेनर सुद्धा सहभागी होतात. 

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी

सप्तशृंगी मंदिर
(Saptashrungi Temple)

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री डोंगर रांगात सप्तशृंगीचे विलोभनीय मंदिर आहे. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते.  सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या या देवीची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा असलेल्या देवीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तश्रृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी

गंगापूर डॅम (Gangapur Dam)

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या असलेल्या धारणांपैकी एक गंगापूर धरण आहे. हे धरण दगड, माती, वाळू यापासून बनवलेले आहे. धरणाजवळ एक सुंदर बाग आहे, ही बाग नेहमीच पर्यटकांना भुरळ घालते. धरणात एक सुंदर बोट क्लब तयार करण्यात आले आहे. येथे पाण्याच्‍या लहरीवर स्‍वार होत साहसी पर्यटनाचा आनंद लुटताना अनेक पर्यटक बघायला मिळतात. क्रुझर जेटसह, बनाना राईड, क्रुझर शिप अशा विविध माध्यमातून नौकानयनाचा आनंद लुटता येतो. हे धारण आणि येथील बोट क्लब पर्यटकांचे आकर्षण ठरते.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते जानेवारी

नाशिकजवळ भरपूर ठिकाणे आहेत जी आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. हे शहर सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे भारतातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्रे (pilgrimage place) आणि दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देखील ओळखले जाते. चला तर मग हिवाळ्यात बहरणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याला (beauty of nature) आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करायला तयार व्हा.